खारपट्ट्यातील शेती

25 Jan 2017
0 mins read

पावसाळ्यापूर्वी शेततळ्यांची कामे पूर्ण व्हावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून श्री. खडसे यांनी अनुभवलेला बदल लवकरच व्यापक स्तरावर अनुभवास मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून खारपट्ट्यात होणार्‍या बदलाचे साक्षीदार शेतकर्‍यांबरोबरच कृषी विभाग व सोबतच कृषी विद्यापीठही झाल्याचे सांगता येईल. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्यंकट मायंदे यांच्यासह विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी या भागाची पाहणी केली. खारपट्ट्यात व्यापक प्रमाणात तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार व्हावा याकरिता विद्यापीठ खारपट्टा शेतकरी समूहाची स्थापना करण्यात आली.

अमरावती, अकोला, बुलडाणा जिल्ह्यात 850 गावे आहेत. या गावपट्ट्यांत 150 ते 160 किलोमीटर लांब, 40 ते 60 किलोमीटर रूंद याप्रमाणे अंदाजे साडेचार हजार चौरस मीटरवर खारपट्टा आहे. काही ठिकाणी जमीन खारवट तर पाणी गोडे, काही ठिकाणी जमीन खारवट व पाणीदेखील खारे, तर काही ठिकाणी मुबलक पाणी, मात्र खारे असा हा भूभाग आहे. कागदावर कोट्यावधी आराखडे या भागाच्या विकासाकरिता आखण्यात आले, प्रत्यक्षात त्यातील एकाचीही मुहूर्तमेढ रोवली गेली नाही. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या शेततळ्यांनी मात्र या भागातील चित्र पालटले असे अपेक्षेने म्हणायला हरकत नाही. या अपेक्षेला साक्षात उतरविणारे एक उदाहरणदेखील घुसर येथील दामोदर खडसे या शेतकर्‍याच्या माध्यमातून अनुभवण्यास मिळत आहे.

श्री. खडसे यांना कृषी विभागाने 2008 मध्ये 45 X 45 मीटर आकाराचे शेततळे मंजूर केले होते. शेताच्या भौतिक रचनेनुसार मूळ आकारात बदल करीत श्री. खडसे यांनी शेततळे 82 X 26 मीटर या आकारात मे 2008 मध्ये खोदले. सप्टेंबर 2008 मधील पावसाच्या पाण्यात शेततळे पूर्णपणे भरले. त्यात 50 ते 52 लाख लिटर जलसाठा झाला. रब्बी हंगामात श्री. खडसे दरवर्षी हरभरा पीक घेत, शेततळे खोदल्यावर व त्यात जलसाठा झाल्यावर त्यांनी 2008 च्या रब्बीतदेखील दहा एकरांवर हरभरा घेतला. उपलब्ध शेततळ्यातील 30 लाख लिटर पाणी तुषार सिंचनाच्या माध्यमातून हरभरा पिकाला देण्यात आले. पीक काढणीनंतर या पाण्याचा झालेला फायदा दिसून आला. दरवर्षी एकरी तीन ते साडेतीन क्विटंल होणारे हरभरा उत्पादन वाढून साडेचार क्विटंलपर्यंत पोहोचले.

खारपट्ट्यातील श्री. खडसे यांच्या या उपक्रमाची माहिती डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठापर्यंत पोचली. विद्यापीठातील कृषी पध्दती व पर्यावरण केंद्राचे प्रमुख डॉ.सुभाष टाले यांनी बाष्पीभवन रोखण्याकरिता शेततळ्यातील पाण्यावर निमतेलाचे आच्छादन करण्याचा सल्ला दिला. एका चौरस मीटरला 25 मि.ली याप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावर 50 लिटर निमतेलाचा वापर करण्यात आला, त्यामुळे 15 ते 20 टक्के पाण्याची बचत झाली. सध्या शेततळ्यात उपलब्ध पाण्याच्या भरवशावर दोन एकरावर तीळ व मुगाचे पीक घेतले आहे व त्याला सहा पाळ्यांची जोड देता आली. खारपट्ट्यात भूगर्भात अवघ्या 30 ते 40 फुटावर पाणी लागले, मात्र पाण्याची ही मुबलकता पिकाच्या कामाची नाही. त्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने शेती व पिण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही, त्यामुळे खारपट्ट्यात आजवर शेतकरी उन्हाळी पिके घेण्यास धजावत नव्हता. शेततळ्यांतील पाण्याच्या उपलब्धतेतून हा चमत्कार पहिल्यांदाच या भागात घडला आहे.

जिल्ह्यात शेततळ्यांतून समृध्दी :


खारपट्ट्यात दामोदर खडसे यांच्या प्रयोगशीलतेमुळे शेततळ्यांचे महत्त्व लक्षात आल्याने जिल्ह्यात प्रस्तावित तीन जहार 686 शेततळ्यांपैकी मोठ्या प्रमाणावरील शेततळी खारपट्ट्यात घेतली जात आहेत. जिल्हा अधीक्षक (कृषी) संतोष आळसे व त्यांचे सहकारी हे काम पूर्णत्वाकडे जावे यासाठी झटत आहेत. त्यामुळे 3686 पैकी सुमारे 1503 शेततळी जिल्हाभरात पूर्णत्वाकडे गेली आहेत. अकोला तालुक्यात 274 शेततळी खोदण्यात आली, त्यापैकी 200 शेततळी खारपट्ट्यात आहेत. मूर्तीजापूर तालुक्यात 190, अकोट तालुक्यातील 280 पैकी 240 खारपट्ट्यात, बाळापूर तालुक्यातील 150 पैकी 100 खारपट्ट्यात, पातूर तालुक्यात 114, तर बाशीर्र्टाकळी तालुक्यात 95 शेततळ्यांचे काम पूर्णत्वास गेले आहे. जिल्ह्यात पूर्णत्वाकडे गेलेल्या या शेततळ्यांच्या कामावर सुमारे 661 लाख रूपये खर्च झाल्याची माहिती श्री. आळसे यांनी दिली. खारपट्ट्यातील घुसर, उगवा, रौंदळा, दहिगाव, वझेगाव या भागातील शेतकर्‍यांकडून शेततळ्यांच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पावसाळ्यापूर्वी शेततळ्यांची कामे पूर्ण व्हावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून श्री. खडसे यांनी अनुभवलेला बदल लवकरच व्यापक स्तरावर अनुभवास मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून खारपट्ट्यात होणार्‍या बदलाचे साक्षीदार शेतकर्‍यांबरोबरच कृषी विभाग व सोबतच कृषी विद्यापीठही झाल्याचे सांगता येईल. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्यंकट मायंदे यांच्यासह विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी या भागाची पाहणी केली. खारपट्ट्यात व्यापक प्रमाणात तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार व्हावा याकरिता विद्यापीठ खारपट्टा शेतकरी समूहाची स्थापना करण्यात आली. या समूहाची विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत आता महिन्या-दोन महिन्यांनी बैठक होईल व त्याद्वारे खारपट्ट्यातील शेतकर्‍यांच्या भेडसावणार्‍या प्रश्‍नांची उकल करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading